शिक्षण ही निरंतर प्रक्रिया असून पदवी प्राप्त केल्यानंतर देखील ते आयुष्यभर सुरु असलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी इतरांशी तुलना न करता आपल्या गतीनं शिकत राहिलं पाहिजे…विद्यादान हे पवित्र कार्य आहे. शिक्षक पदावरील व्यक्तीची निवड गुणवत्ता आणि कार्यक्षमतेच्या आधारे झाली पाहिजे. महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये गुणवत्तेच्या आधारे शिक्षकांची निवड करण्यासाठी पारदर्शक प्रणाली निर्माण करण्याबाबत आपण आग्रही आहोत,’ असं प्रतिपादन राज्यपाल आणि  विद्यापीठांचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी आज केलं. मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत सर कावसजी जहाँगीर दीक्षान्त सभागृह इथं संपन्न झाला. दीक्षान्त समारंभामध्ये १,६४, ४६५ स्नातकांना पदव्या, ४०१ स्नातकांना पी.एचडी. तर १८ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकं प्रदान करण्यात आली.

‘शिक्षकांची निवड करताना एक सामायिक परीक्षा देखील घेतली जावी या मताचं आपण असून या संदर्भात विचारविनिमय सुरु आहे. सर्व विद्यापीठांनी वर्षाच्या सुरुवातीलाच वर्षभराचं शैक्षणिक वेळापत्रक तयार करावं, ते विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावं आणि त्याची काटेकोरपणं अंमलबजावणी करावी. जून महिन्यापर्यंत निकाल जाहीर करून एक महिन्यात दीक्षांत समारोह आयोजित करावं जेणंकरून विद्यार्थ्यांना पदवी लगेचच मिळेल. महाविद्यालये आणि विद्यापीठ विभागांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे, याकडे लक्ष वेधून विद्याथ्यांचं नुकसान होऊ नये, यासाठी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मार्ग काढला पाहिजे.  विद्यार्थ्यांनी आरोग्यासाठी व्यायाम आणि चालणे या सवयी लावून घेतल्या पाहिजे आणि अंमली पदार्थांपासून दूर राहिले पाहिजे, ‘असं राज्यपाल आणि  विद्यापीठांचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी सांगितलं.

दीक्षान्त समारंभाला उच्च , तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील , कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा,भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय कंरदीकर, अमेरिकेच्या सेंट लुईस विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. फ्रेड पेस्टेलो, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू डॉ. अजय भामरे, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राचार्य आणि स्नातक  उपस्थित होते.